झारखंडमध्ये नक्षलवादी ठार   

लातेहार,(झारखंड) : झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा ठार झाला. त्याच्या डोक्यावर पाच लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.
 
या कारवाईदरम्यान आणखी एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली, असेही ते म्हणाले. रविवारी रात्री मौहादंड पोलिस स्टेशन हद्दीतील दौना येथील जंगलात ही चकमक उडाली. या चकमकीत मनीष यादव मारला गेला. तर, कुंदन खेरवार या नक्षलवाद्यास अटक करण्यात आली, असे पलामूचे पोलिस उपमहानिरीक्षक वाय.एस. रमेश यांनी सांगितले. कुंदनच्या डोक्यावर दहा लाखांचे बक्षीस असल्याचे सांगितले जाते. 
 
दोन दिवसांपूर्वीच झारखंड जन मुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) प्रमुख पप्पू लोहारा आणि प्रभात गंजू चकमकीत ठार झाले होते. लोहारा याच्या नावावर दहा लाखांचे तर गंजू याच्या डोक्यावर पाच लाखांचे बक्षीस होते.
 
दौना येथील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे, सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली होती. चहुबाजूने वेढल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यास सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. यात यादव मारला गेला, असे अधिकार्‍यांनी सांगितले. तर, खेरवार यास पकडण्यात सुरक्षा दलास यश आले. या परिसरात अद्याप शोध मोहीम सुरु आहे.
 

Related Articles